हिवाळी अधिवेशनात शिक्षक परिषदेचे धरणे
अहिल्यानगर, ता. ८ :
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी (ता.१३) नागपूर येथील यशवंत स्टेडियममध्ये धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन केले आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी आणि शासनाच्या धोरणांविरोधात ठोस भूमिका घेण्यासाठी शिक्षक परिषदेने. आंदोलन उभारले आहे. १५ मार्चचा अशैक्षणिक कार्यासंबंधी शासन निर्णय . रद्द करावा, टीईटी परीक्षा बंधनकारक पात्रता अट रद्द करावी. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विना-अनुदानित / अंशतः अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांना जुन्या पेन्शनपासून वंचित करणारे ३१ ऑक्टोबर २००५ (वित्त विभाग) आणि २९ नोव्हेंबर २०१० (शिक्षण विभाग) चे शासन निर्णय रद्द करावेत, वेतन अनुदानाच्या आधारे सर्व शाळांना
वेतनेत्तर अनुदान द्यावे आदी शिक्षक परिषदेच्या मागण्या आहेत. दरम्यान, हे आंदोलन राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह राजकुमार बोनकिले, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, कार्याध्यक्ष माजी शिक्षक आमदार नागो गाणार, भगवान साळुंखे, संघटनमंत्री किरण भावठाणकर, सहसंघटनमंत्री दिलीप अहिरे, महिला आघाडीप्रमुख पूजा चौधरी, कार्यालय मंत्री निरंजन गिरी आदींच्या नेतृत्वाखाली होणार आहे. सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर दबाव आणण्यासाठी राज्यातील शिक्षक नागपूरला धडकणार आहेत. शिक्षकांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा बाबासाहेब बोडखे यांनी दिला.
