पुण्य नगरी / प्रतिनिधी:
चामोर्शी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्या वतीने ५ डिसेंबर रोजी नागपूर येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाला राज्यातील सर्व शिक्षक परिषदेसह सर्वांनी तत्कालीन परिस्थितीत विरोध करण्यात आला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रतिनिधीनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी एकही शाळा बंद होणार नाही, असे अभिवचन सभागृहात दिले. परंतु प्रत्यक्षात राज्यात २०२४-२५ ची पटसंख्या विचारात घेऊन संच निर्धारण करण्यात आले व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सुमारे एक हजारपेक्षा जास्त शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. तसेच १ हजार ९०० शाळा एकशिक्षकी झाल्या आहेत. सभागृहात दिलेल्या आश्वासनाकडे पाहता फार मोठी विसंगती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मोर्चा व धरणे आंदोलन नोटीस देण्यात आली आहे. तसेच ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यव्यापी संपात सहभाग व इतर मागण्या संदर्भात निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री कार्यालयात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे वतीने देण्यात आले आहे. परिषदेच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास आंदोलनची तीव्रता वाढविण्यात येईल, असे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी सांगितले आहे. धरणे आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *